पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज: - डॉ. मधुकर बाचुलकर

दिव्यराज न्युज जत :-जगभरातील १८० देशांच्या २०२२ वर्षासाठीच्या पर्यावरण कामगिरी निर्देशांकात भारत सर्वात तळाला असून भविष्यात तो सुधारण्यासाठी व्यापक पर्यावरणाबाबत जनजागृतीची गरज आहे असे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचुलकर यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि. ७ ते १३ जून, २०२२ या कालावधीत आयोजित "माझी वसुंधरा अभियान" मध्ये 'पर्यावरण समस्या व उपाय' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सकाळ सत्राचे प्रभारी प्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण हे होते.
डॉ. बाचुलकर पुढे म्हणाले की, मानवी लोकसंख्या व जागतिक तापमान वाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा सर्वात जास्त फटका जैवविविधतेवर होत असून अनेक प्राणी व वनस्पती यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात मानवजात देखील नष्ट होईल. यामुळे प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल साधण्यासाठी जत सारख्या दुष्काळी भागात पडीक माळरानावर जास्तीत जास्त फळबागा व इतर वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. तरच जागतिक तापमानवाढ, हरितवायू उत्सर्जन, ओझोनचा -हास या समस्या भविष्यात कमी होतील. पर्यावरण समस्या व त्यावरील उपाय यांसाठी जनजागृती करण्यासाठी निसर्ग मंडळे स्थापन करावीत असे आवाहन केले. जत सारख्या दुष्काळी भागामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचे जतन होणे आवश्यक आहे. तरच जागतिक क्रमवारीत भारताचा पर्यावरण निर्देशांक सुधारेल. 
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी डॉ. मधुकर बाचुलकर यांनी महाविद्यालयाच्या बागेतील विविध विभाग, बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस व सक्युलंट गार्डन, आमराई, नारळ बाग, तुती, बांबू व औषधी वनस्पती लागवड यांची पाहणी करून मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्राणीशास्त्र विभागाने आयोजीत केलेल्या 'पर्यावरण समस्या व उपाय' या विषयावर आधारित आयोजित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन डॉ. बाचुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट भित्तीपत्रिकेचे सादरीकरण करणा-या विजेत्या विद्यार्थीनी कु. कविता खरात (प्रथम क्रमांक), कु. पल्लवी पवार (द्वितीय क्रमांक), कु. रोहिणी मुंजे (तृतीय क्रमांक) यांचा पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी माजी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय साठे यांनी ग्रंथालयाला त्यांच्या संग्रहातील जुने संदर्भ ग्रंथ भेट दिले.
प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले, सूत्रसंचालन श्री. रविंद्र मदभावी यांनी केले तर आभार सहा. प्रा. नवनाथ लवटे यांनी मानले. यावेळी दुपार सत्राचे प्राचार्य प्रा. महादेव करेन्नावर, प्रा. कृष्णा रानगर, डॉ. शिवाजी कुलाळ, डॉ. मल्लाप्पा सज्जन, डॉ. विजय जाधव, डॉ. संगीता देशमुख, डॉ. ललिता सपताळ, श्री. बिराप्पा पुजारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सांगली कृ.उ.बा.स. निवडणुकीत भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपला घरचा आहेर!

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.