13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

दिव्यराज न्युज जत :- मानवता हाच खरा धर्म असून धर्म जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नव्हे असा उद्घोष करत अखिल विश्वातील मानवजातीला सत्य, प्रेम, दया, करुणा, सहनशीलता आणि अहिंसेची शिकवण देणारी दिव्य विभूति बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे जीवन मानवजातीसाठी महान वरदान होते.
सर्वांचा परमपिता परमात्मा एकच असून आपण सारी त्याचीच लेकरं आहोत. त्या एकाला जाणले आणि मानले तर अवघी मानवजात एकत्वाच्या धाग्यात गुंफली जाऊ शकते आणि या धरतीचे स्वर्गात रुपांतर होऊ शकते असा त्यांचा ठाम विश्वास होता. मानवा-मानवामध्ये जात-पात, धर्म-सांप्रदाय, वर्ण-वंश, भाषा-प्रांत, देश-वेश अशा अनेकविध कारणांमुळे उभ्या राहिलेल्या भिंती सत्यज्ञानाने ढासळू शकतात आणि “World Without Walls” (भिंतीरहित विश्व) ही संकल्पना साकार होऊ शकते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवले. 
जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापन करण्यासाठी मानवाने हा सत्यसंदेश मनापासून स्वीकारायला हवा असा त्यांचा आग्रह होता. हा संदेश सर्वदूर पसरविण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा श्वास अन् श्वास खर्ची घातला. जगभर आध्यात्मिक कल्याणयात्रा केल्या आणि कोट्यावधी लोकांना सत्यज्ञानाचा अमृताने कृतार्थ केले. 
सर्वमान्य सर्वस्वीकार्य: 
आपल्या अलौकिक प्रेमाने समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांची मने बाबाजींनी जिंकलेली होती. म्हणूनच संत निरंकारी मिशनमध्ये जगातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदताना दिसत आहेत. कोणत्याही कारणावरुन श्रेष्ठ-कनिष्ठतेचा लवलेषही त्यांच्या मनाला कधी शिवला नव्हता. प्रत्येक धर्मातील मान्यवर सज्जनांकडून बाबाजींचे व त्यांच्या दिव्य विचारधारेचे मन:पूर्वक स्वागत केले जात होते. बाबाजींची विचारधारा लोकांच्या व्यक्तिगत जीवनशैली किंवा श्रद्धा भावनांना धक्का न लावता केवळ मानवतेच्या आधारावर आपुलकी, प्रेम, सद्भावाने, सामंजस्याने व एकोप्याने आनंदाने जीवन जगायला शिकवते. 
मानवाने आधी माणूस बनावे मग काहीही बनावे असे सांगून बाबाजी यथार्थ व यशस्वी मानवी जीवन जगण्याची कला शिकवत असत. मानवी जीवनाचे दोन मुख्य पैलू आहेत. एक भौतिक आणि दूसरा आध्यात्मिक. दोन्ही स्तरावर मानवाने यशस्वी होऊन इहलोक सुखी आणि परलोक सुगम करावा, अशी त्यांची शिकवण होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानीत : 
बाबा हरदेवसिंहजी महाराज आध्यात्मिक व भौतिक जीवनाशी अशी सुंदर सांगड घातली आहे की, जगभर ही विचारधारा लोकप्रिय बनून गेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर संत निरंकारी मंडळाला सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे. सन 2007 साली युरोपियन पार्लमेंटमध्ये बाबा हरदेवसिंहजी महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी पूज्य माता सविंदरजी यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले होते.  सन 2013 मध्ये बाबाजींना गांधी ग्लोबल फॅमिलीच्या वतीने प्रतिष्ठित महात्मा गांधी सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले तर सन 2014 मध्ये गांधी शांती पुरस्कार-2013 प्रदान करण्यात आला.  तसेच दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ रोजी यू.के.मध्ये स्वेच्छा सामाजिक सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च ‘क्वीन्स गोल्डन ज्युबिली ॲवॉर्ड’ पुरस्काराने बाबाजींना सन्मानित करण्यात आले. याशिवाय कित्येक देशांनी सद्गुरु बाबाजींना जी सन्मानपत्रे व प्रशस्तीपत्रे दिली आहेत ती शेकडोंच्या संख्येने असून मिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 
असाधारण परिस्थितीत निरंकारी बाबा म्हणून प्रकट
बाबा हरदेव सिंह जी महाराज अत्यंत असाधारण आणि शोकाकूल परिस्थितीमध्ये निरंकारी मिशनचे प्रमुख बनले. 24 एप्रिल 1980 रोजी कट्टरपंथी धर्मांधांनी विश्वामध्ये सुख-शांती पसरविणारे मिशनचे तत्कालीन प्रमुख, मानवतेचे मसिहा सद्गुरु बाबा गुरुबचन सिंह जी यांची हत्या करुन मिशनशी ताटातूट केली होती. तरुण हरदेवांनी सद्गुरुबरोबरच आपला प्राणप्रिय पिताही गमावला होता. हाच तो क्षण होता ज्यावेळी निरंकारी मिशनच्या प्रत्येक अनुयायाचे धैर्य, संयम आणि सहनशीलता पणाला लागली होती. कारण या घटनेने मिशनच्या भवितव्यालाच आव्हान दिले होते. मानव समाजातीलच काही माथेफिरु दुष्ट शक्तींनी दैवी विधान पायाखाली तुडविल्यामुळे ईश्वरीय इच्छेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण दिली गेलेल्या निरंकारी भक्तांना ही ईश्वरीय इच्छा मानने अत्यंत कठीण जात होते. 
अशा वेळी सद्गुरु बाबाजींनी उद्घोष केला, “बाबा गुरुबचन सिंह जी यांचे बलिदान ही ईश्वरीय इच्छा आहे. लोकांची समज वेगवेगळी असते. अज्ञानी जनांना वाटते की, यामुळे प्रचंड रक्तपात होईल. परंतु भक्तांचा ठाम विश्वास आहे की, हा सर्वोच्च त्याग शांती आणि सहिष्णुता स्थापित करील. अशा प्रकारच्या श्रेष्ठ विचारांचा अंगिकार करुन आपण मिशनचा संदेश अधिक मोठ्या प्रमाणावर पसरविला पाहिजे."
शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्याचे आश्वासन कृतीत उतरविण्यासाठी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी अजिबात उसंत न घेता देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. त्यांना पूर्ण जाणीव होती की अचानकपणे बाबा गुरुबचन सिंह जी यांचा साकार रुपातून झालेला वियोग लक्षात घेता संपूर्ण भारतवर्ष आणि विदेशातील निरंकारी भक्तांना शांत करण्याची आणि त्यांचे सांत्वन करण्याची नितांत गरज आहे. 
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशन मानवता, विश्वबंधुत्व, प्रेम, शांती, समता, अहिंसा अशी महान ध्येये गाठणारी आध्यात्मिक चळवळ बनून गेली आहे.  
मानवजातीला सत्याशी अवगत करण्यासाठी सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. विश्वभर मानव कल्याण यात्रा, वार्षिक संत समागम, प्रादेशिक संत समागम आणि आंतरराष्ट्रीय संत समागम आयोजित करुन मानवतेचा संदेश कंठरवाने देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
बाबा हरदेवसिंहजी महाराज आज साकार रुपात राहिले नसले तरी दिव्य आणि भव्य अशा अलौकिक कार्यामुळे ते इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत. मानवतेच्या इतिहासामध्ये त्यांचे नांव सुवर्णाक्षराने कोरले जाईल. त्यांची महान शिकवण मानवतेला अनंतकाळपर्यंत मार्गदर्शन करत राहील.

Comments

Popular posts from this blog

सांगली कृ.उ.बा.स. निवडणुकीत भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपला घरचा आहेर!

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज: - डॉ. मधुकर बाचुलकर

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.