रक्तदान हेच जीवनदान:- प्राचार्य डॉ. सुरेश पाटील,राजे रामराव महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- रक्तदान हेच जीवनदान आहे .रक्तदानाप्रती जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे. मग ते कुणाहीसाठी असो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, माजी विद्यार्थी संघटना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व एचडीएफसी बँक शाखा- जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी एचडीएफसी बँकेचे अधिकारी युवराज खरात, रोहिणी साळुंखे, सुनिता बामणे उपस्थित होते.
अधिक बोलताना प्राचार्य म्हणाले, रक्तदान हे जीवनदान असून महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थी व जत परिसरातील एकुण 101 नागरिकांनी महाविद्यालयात येऊन रक्तदान केल्याचा आनंद आहे. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि चांगले शारीरिक आरोग्य लाभते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. रक्तदान करुन तुम्ही केवळ एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे महान कार्य करत नाही तर ही प्रक्रिया तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. रक्तदानाच्या आरोग्यदायी फायद्यांपासून दुर्दैवानं बरेच जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती करणे हाच या शिबीराचा उद्देश होता, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले तर प्रा. पुंडलिक चौधरी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रा.नवनाथ लवटे, प्रा.अभयकुमार पाटील, प्रा. सतीशकुमार पडोळकर याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. प्रकाश माळी, प्रा.लक्ष्मण मासाळ, प्रा.लता करांडे, प्रा.प्रफुल गायकवाड, प्रा.सोनाली पटेकर, प्रा.प्रियांका भुसणुर व विद्यार्थी उपस्थीत होते.
Comments
Post a Comment