वित्तीय गुंतवणुकीसाठी एलआयसी सर्वोत्तम पर्याय: नितीनकुमार पारेकर, जतेत वित्तीय क्षेत्र व गुंतवणूक व्यवस्थापन यावर व्याख्यान.
दिव्यराज न्युज जत :- (राजू ऐवळे) देशातील एकमेव सरकारी विमा महामंडळ असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये वित्तीय गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन जत व कवठेमंकाळ शाखेचे विकास अधिकारी नितीनकुमार पारेकर यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी विकास मंडळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साप्ताहिक कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. भीमाशंकर डहाळके उपस्थित होते.
अधिक बोलताना पारेकर म्हणाले, सरकारी क्षेत्राच्या गुंतवणुकीतील पर्यायांचा विचार करता भारतीय आयुर्विमा महामंडळ विम्यासह अधिकचा परतावा देणारी एक विश्वसनीय संस्था आहे. भारतातील पहिल्या 20 सर्वोच्च नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये एलआयसीचा क्रमांक एक आहे. भारत सरकारच्या विविध पायाभूत सुविधा व विकासासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची केंद्र सरकारच्या विविध विभागांना सातत्याने मदत होते. यातून अधिकचा परतावा मिळत असल्यामुळेच पॉलिसीधारक अर्थात एलआयसी जगातील सर्वात श्रीमंत महामंडळ आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भारतीय आयुर्विमा महामंडळामध्येच आपली गुंतवणूक करावी आणि तोच सर्वोत्तम पर्याय आहे, असेही ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भीमाशंकर डहाळके म्हणाले, सध्या गुंतवणुकीचे अनेक खाजगी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र खात्रीशीर व अधिकचा परतावा देणारी एलआयसी यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे.
तिसऱ्या दिवसाच्या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.सोनाली पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अतुल टिके तर प्रा.किरण साळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अर्थशास्त्र विभागप्रमुख डाँ. शंकर गावडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नारायण सकटे, डॉ. अशोक बोगुलवार प्रा. दादासाहेब रणदिवे, पत्रकार अनिल बन्ने याचबरोबर वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment